
कम्युनिटी सेंटर नाही तर बुद्ध विहारच -उदय सामंत यांची ग्वाही
राज्य उत्पादन शुल्काच्या जागेत कम्युनिटी सेंटर उभारण्यात येणार असल्याच्या वावड्या विरोधक उठवत आहेत. परंतु कम्युनिटी सेंटर नाही तर बुद्धविहारचं उभारण्यात येणार आहे. शिवाय येत्या वर्ष-दीड वर्षात देखणं, सुसज्ज बुद्धविहार उभं राहिल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे ’थिबाराजा कालिन बुद्धविहार संबोधन’ जाहीर सभा रविवार दि. २३ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपिठावर प्रितम आयरे, मारुती कांबळे, ऍड. शिवराज जाधव, भगवान जाधव, प्रकाश पवार उपस्थित होते.
मी कधीही जात-पात, धर्म-पंथ असा भेदभाव केला नाही व करणारही नाही. माझ्यावर प्रेम करणार्या मंडळींना मी जवळ करत आलो आहे. मात्र समाजातील काही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरत आहेत. बुद्धविहारासाठी शासनाने जमीन दिली आहे. ती जमीन मी कुणाच्याही ताब्यात देणार नाही तसेच बुद्धविहार झाल्यानंतरही ते अन्य कुणाच्या ताब्यात देणार नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचे मी पालन करणारा आहे. परंतु बुद्धविहाराच्या बाबतीत जातीचं राजकारण केलं जात आहे. त्यामुळे मी काय करावं हे मला कुणी शिकवू नये. माझ्यावर कुणी टीका केली तरी मला कुणावरही टीका करायची नाही. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या जागेत सुसज्ज बुद्धविहारच होईल, हे सत्य आहे. पालीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यात येणार असून, त्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. तथागत गौतम बुद्धांचा विचार कसा पुढे न्यायचा हे मला सांगण्याची आवश्यकता नाही मी सर्वांना बरोबरच घेऊन जाणार आहोत.www.konkantoday.com




