शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलनकोतवली ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत इशारा

चिपळूण () : लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील कोतवली गावात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी वाहणारी पाईपलाईन फुटल्याने खाडीचे पाणी दूषित होत असल्याने व ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी एमआयडीसीच्या औद्योगिक भवनात ग्रामस्थ व अधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या मागण्या ठामपणे मांडल्या. शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला नाही किंवा सांडपाणी थेट सोडण्याचे प्रकार थांबले नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांची समस्या ऐन दिवाळीत अधिकच गंभीर झाली होती. कोतवली येथे एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी वाहणारी पाईप लाईन फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे गावातील नागरिक, तसेच जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

सोमवारी झालेल्या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री. कुलकर्णी, एमआयडीसीचे अधिकारी श्री. हळदणकर, सीईटीपीचे भूषण शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते. कोतवली ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्षता तांबे, सदस्य मंगेश तांबे, संगीता धापसे, सुनीलभाऊ सावर्डेकर, जाफर परकर, केतन पेवेकर, रुपेश पेवेकर, अंकुश पेवेकर, रुपेश जुवळे, नरेश जाधव, सचिन तांबे, राजेंद्र तांबे, प्रथमेश धापसे, प्रल्हाद धापसे, सुनील जाधव, सत्यवान जुवळे, सचिन जुवळे, वसंत जुवळे, रुपेश जुवळे, विनोद आंब्रे आदी ग्रामस्थ बैठकीस उपस्थित होते.

ग्रामस्थांनी बैठकीत मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये, कोतवली गावाला तातडीने शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, गेल्या २०-२५ वर्षांपासून दूषित पाण्यामुळे शेती व फळबागांचे झालेले नुकसान भरून द्यावे, प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्यावे, विद्यार्थ्यांना उद्योगांकडून शैक्षणिक दत्तक योजना राबवावी, तसेच परप्रांतीयांऐवजी स्थानिकांना रोजगार द्यावा, अशा मागण्यांचा समावेश होता.आजच्या वृत्तपत्रांमध्ये ग्रामस्थ पाईपलाईन फोडतात, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ज्या अधिकाऱ्यांनी ही बातमी दिली, त्यांचे नाव सांगावे, अन्यथा आपण फौजदारी गुन्हा दाखल करू, असेही सुनीलभाऊ सावर्डेकर यांनी या वेळी सांगितले.

अधिकाऱ्यांनी या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. येत्या पंधरा दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणखी एक बैठक घेऊन या समस्यांवर ठोस निर्णय घेण्याचेही त्यांनी सांगितले. तथापि, ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत “आश्वासन नव्हे, कृती हवी” असे स्पष्टपणे सांगत, मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.

चौकट
या बैठकीत ग्रामस्थांमधील मतभेद समोर आले. उपसरपंच सुभाष पडवळ व सदस्य संदीप आंब्रे व अन्य हे बैठकीतून बाहेर पडले. बैठकीच्या नियोजनाची कल्पना नव्हती. यामध्ये ज्या मागण्या मांडल्या गेल्या आहेत, त्याचीही ग्रामपंचायतला कल्पना नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर बैठक झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button