
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शाखा प्रमुख पदापर्यंत कोणीही कार्यक्षेत्र सोडू नये- एकनाथ शिंदे यांचे आदेश
आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपआपल्या परिनं तयारीला लागला असून, यामध्ये शिंदेंचा शिवसेना हा पक्षसुद्धा मागे राहिलेला नाही. गेल्या काही काळापासून सातत्यानं विवियध बड्या पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये होणारे बदल आणि पक्षबदल पाहता कार्यकर्ते आणि आमदार ‘नॉट रिचेबल’ होऊ नयेत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यचा धर्तीवर शिवसेनेकडून शाखा प्रमुख पदापर्यंत कोणीही कार्यक्षेत्र सोडू नये असा उपमुख्यमंत्री शिंदेंचा आदेश असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होईपर्यंत आमदार, खासदार, माजी नगरसेवक ते अगदी शाखाप्रमुख पदा पर्यंतच्या सर्वत नेतेमंडळींना मतदार संघातच राहण्याच्या पक्षाकडून स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत.
अपरिहार्य कारणास्तव कार्यक्षेत्राच्या बाहेर जाताना मध्यवर्ती कार्यालयात कळवणं बंधनकारक असल्याची बाबही या सूचनांमध्ये अधोरेखित करण्यात आली असून, निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना अलर्ट मोडवर आल्याचच इथं स्पष्ट होत आहे.
महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी हा निर्णय घेतला असून, शिवसेना पक्षाच्या वतीनं सबंधित पदाधिकाऱ्यांना या सूचना केल्या असून, सदर सूचनांसंदर्भातील एक अधिकृत पत्रकही पक्षाच्या वतीनं जारी करण्यात आलं आहे. प्रामुख्यानं शिवसेनेच्या बैठकीतही एकच सूर आळवण्यात आला असून, पदाधिकाऱ्यांनी विनाकारण आपलं कार्यक्षेत्र सोडून मुंबईत येऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली. ज्या व्यक्तींवर महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आहे अशा व्यक्ती सातत्यानं मुंबईत दिसत असून, निवडणुका केव्हाही जाहीर होतील अशी स्थिती असल्यानं पदाधिकाऱ्यांनी मुंबईत न येता आपल्या कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रीत करावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.




