
काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही,मुंबईत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार
मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दरम्यान कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस त्यांनी केल्याने. राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
भाई जगताप म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेच काय आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतही निवडणूक लढणार नाही. मी मुंबई कॉंग्रेसचा अध्यक्ष होतो त्यावेळी सुद्धा हेच सांगितले होते.कॉंग्रेसच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्येही मी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच गोष्टी सांगितली.या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात,नेत्यांच्या नाही, असे ते म्हणाले.
कोणी कोणासोबत लढायचे, हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. जे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांचीही इच्छा असते, आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी असे त्यांना वाटते.त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत.त्यामुळे आम्ही मुंबईत स्वबळावर लढू असे काँग्रेसच्या बैठकीत सांगितले असल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.
भाई जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत.त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष पदही भुषवले आहे.त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूंसोबत कॉंग्रेस लढणार नसल्याच्या विधानामुळे चर्चा रंगली आहे.




