
देवरुख येथील सोने व्यवसायिकाचे अपहरण करून दागिने व सोने लुटणाऱ्या मुंबईच्या लुटारू टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या ; पावणे सात लाखाचा मुद्देमाल हस्तगत
काही दिवसापूर्वी देवरुख साखरपा मार्गावर देवरुख येथील सोने व्यवसायिकाचे अपहरण करून त्याला अन्य ठिकाणी नेऊन त्याच्याकडील सोने व दागिने लुटण्याचा प्रकार घडला होता त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती आरोपींच्या टोळीने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून खंडणीची मागणी केली होती मात्र रत्नागिरी पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत मुंबई परिसरात कार्यरत असलेल्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले आहे.
या गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींना तांत्रिक तपासाच्या आधारे मुंबई आणि ठाणे परिसरातून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि पावणे सात लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख साखरपा रोडवर ही थरारक घटना दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १०:३० ते १०:४५ वाजण्याच्या सुमारास साखरपा ते देवरुख जाणारे वांझोळे गावी रोडवर घडली होती. मार्लेश्वर फाटा येथील सोने व्यवसायिक श्री. धनंजय गोपाळ केतकर (वय ६३) हे त्यांच्या मर्सिडिज कारमधून घरी परतत असताना, एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या १० अनोळखी इसमांनी त्यांच्या गाडीला अडवले. आरोपींनी श्री. केतकर यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांचे ₹१६,००,०००/- किमतीचे तीन सोन्याचे चैन आणि खिशातील ₹२०,०००/- रोख रक्कम काढून घेतली. अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्यांना दुसऱ्या गाडीत बसवले आणि जीवे मारण्याची धमकी देत ₹५,००,०००/- (पाच लाख रुपयांची) खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास डोक्यात कठीण वस्तू मारून दरीत टाकून देण्याची धमकीही त्यांनी दिली होती. अखेर, १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२:३० वाजता केतकर यांना लांजा जवळील वाटूळ रोडवर सोडून देण्यात आले. यानंतर श्री. धनंजय केतकर यांनी देवरुख पोलीस ठाणे येथे १० अनोळखी आरोपींविरुद्ध तक्रार दिली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी तातडीने तपास पथके नेमण्याचे निर्देश दिले, तर अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. देवरुख पोलीस ठाण्याकडून तपास सुरु असतानाच, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) समांतर तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस हवालदार ९०९/विजय आंबेकर यांनी केलेल्या तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपी बदलापूर (जि. ठाणे) येथे लपल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्ह्यातील दोन आरोपींना बदलापूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य दोन आरोपींना पनवेल (नवी मुंबई) येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक स्कॉर्पिओ वाहन, पाच मोबाईल हँडसेट आणि ₹१,२०,०००/- रोख रक्कम असा मिळून एकूण ₹६,७५,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे (LCB) आणि पोलीस निरीक्षक श्री. उदय झावरे (देवरुख) यांच्या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा उपविभाग श्री. सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई यशस्वी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास देवरुख पोलीस ठाणे करीत आहेत.
या महत्वाच्या कामगिरीत संदीप ओगले, प्रशांत बोरकर, पांडुरंग गोरे, सुभाष भागणे, नितीन डोमणे, शांताराम झोरे, विनायक राजवैद्य, बाळू पालकर, विक्रम पाटील, विजय आंबेकर, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, योगेश नार्वेकर, दिपराज पाटील, प्रविण खांबे, अमित कदम, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, योगेश शेट्ये, विनोद कदम, अतुल कांबळे, दत्ता कांबळे, रमिज शेख, निलेश शेलार आणि शितल पिंजरे. यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली.




