
धुव्वाधार पावसाचा मुक्काम अजून वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून शेती आणि गावे पाण्याखाली गेली आहेत. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. मात्र मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून धुव्वाधार पावसाचा मुक्काम अजून वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात २८ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण बंगालच्या उपसागरामध्ये २४ सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान राहणार असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांत २५ सप्टेंबरपर्यंत मेघगर्जनेसह वादळी पाऊस होऊ शकतो. २६ सप्टेंबरपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव राज्यभर दिसून येईल. या कालवधीत अनेक जिल्ह्यांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल.




