कोतवडे गावातील बौद्धवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने केली सुटका

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावातील बौद्धवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या एका बिबट्याची आज वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सुटका करण्यात आली. सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली, त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित पकडण्यात आले.

आज, दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास कोटवडे गावचे सरपंच संतोष बारगोडे यांनी पाली येथील वनपाल यांना एका बिबट्याच्या विहिरीत पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच तात्काळ वन परिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी यांना कळवण्यात आले. त्यानंतर बचाव पथक, पिंजरा आणि इतर आवश्यक साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले.

ही विहीर ग्रामपंचायतीच्या घर क्रमांक ४२२ च्या मागील बाजूस भर वस्तीमध्ये आहे. ४० फूट खोल असलेल्या या विहिरीला तीन फूट उंचीचा चिरेबंदी कठडा आहे. विहिरीतील पाण्याची पातळी १० ते १२ फूट असून, बिबट्या विहिरीत उतरण्यासाठी असलेल्या पायरीवर पाण्यात बसलेला होता.

बिबट्याला पाहिल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ नियोजन केले. पिंजऱ्याला दोऱ्या बांधून तो सुरक्षितपणे विहिरीत सोडण्यात आला. बिबट्याने अवघ्या १५ मिनिटांत पिंजऱ्यात प्रवेश केला आणि त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. अभिजीत भगवान कसाळकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button