
स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात ठाकरे शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर करून हे मीटर कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे. या संबंधातील टेंडर मंजूर करून सर्वत्र मीटर लावण्याची मोहीम सुरू झालेली आहे. वास्तविक हे मीटर मोफत लावले जाणार नाहीत. केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित सर्व खर्च वीजदर निश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केला जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढीच्या रूपाने १ एप्रिल २०२५ पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित व स्पष्ट आहे. त्यामुळे केवळ महावितरण कंपनी वा येणाऱ्या खासगी वितरण कंपन्या वा सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणनूच ही योजना आणलेली आहे, असे स्पष्ट दिसून येत आहे.
त्यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवारी (२३ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत तसेच उपनेते तथा माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने, संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात माजी खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय रत्नागिरी ते अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) मधील शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, शिवसहकार सेना, रिक्षासेना व अंगीकृत सर्व संघटनेती सर्व पदाधिकारी, सर्व उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक व सर्व वीज ग्राहकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी केले आहे.




