
तिहेरी हत्याकांड : दुर्वास पाटीलसह विश्वास पवार पोलीस कोठडी
मिरजोळे-नाखरेकरवाडी येथील भक्ती मयेकरसह आणखीन दोन खूनात सामिल दोघांना शहर पोलिसांनी रविवारी एका गुन्ह्यातून दुसर्या गुन्ह्यात वर्ग करत पुन्हा अटक केली. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आदुर्वास दर्शन पाटील ( 25, रा. जंगमवाडी, वाटद खंडाळा) व विश्वास विजय पवार (41, ऱा कळझोंडी रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत.
मिरजोळे येथील रहिवासी भक्ती मयेकर हिचा खून केल्यानंतर आणखीन दोन खून केल्याचे संशयित दुर्वास पाटील याच्याकडून उलक झाली होती. 29 एप्रिल 2024 ला तालुक्यातील कळझोंडी येथील रहिवासी सिताराम लक्ष्मण वीर ( 55) यांना संशयित दुर्वास आणि विश्वास यांनी बारमध्ये जीव जाईपर्यंत मारहाण केली होती. त्यांना चक्कर आल्याचा बहाणा करुन उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मृत सिताराम वीर हा दुर्वासशी प्रेमसंबध असलेल्या भक्ती मयेकर हिच्याशी फोनवरुन बोलत असल्याचेही पुढे आले होते. या कारणातून त्याचा काटा काढण्यात आला असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर सिताराम वीरला झालेली मारहाण ही त्यांचा साथीदार राकेश जंगम याला माहित होती. राकेश कडून या सर्व प्रकरणाची उकल होईल या भितीने राकेश जंगमला कोल्हापूरला जायचे आहे असे सांगून घरातून बोलावून घेतले आणि कोल्हापूरला जात असताना गाडीत गळा आवळून मारुन आंबा घाटातच फेकून दिले होते.




