
महायुती म्हणून एकत्र लढणार , आम्हाला घसघशीत बहुमत मिळेल- पालकमंत्री उदय सामंत
आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत, आम्हाला घसघशीत बहुमत मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. प्रत्येक पक्षाने आपापल्या नेत्यांमार्फत आपली भूमिका मांडावी असे सांगत, प्रत्येक जागेवर महायुतीकडून तयारी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, ‘मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.’ यासोबतच, मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील एका हॉर्डिंगवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना ना.सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील युती अभेद्य असल्याचं सांगितलं. ‘आमच्यात कोणताही श्रेयवाद नाही. ज्यांच्या पोटात पोटशूळ उठलाय, तेच असे गैरसमज पसरवत आहेत,’ असे ते म्हणाले. हे सांघिक काम असून, त्यात देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पाया पडत असतील तर त्यात गैर काही नाही, असे सांगून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.