
नवी मुंबई विमानतळाचां नामकरण वाद न्यायालयात! दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास विलंबामुळे याचिका!!
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन राजकीय नेते, सत्ताधारी पक्षांनी अनेकदा दिले, परंतु अद्याप याबाबत कार्यवाही झालेली नाही. केंद्र सरकारकडून होत असलेल्या या विलंबाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न कशा पद्धतीने आणि कालावधीत निकाली लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरू असून, राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनीही पाठिंबा दर्शविला आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारने नामकरणाचा ठराव मंजूर करून तो केंद्राकडे पाठविला आहे. मात्र, अंमलबजावणीस विलंब होत आहे.
सप्टेंबरअखेर विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर होऊनही नामकरणाचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. आता या प्रश्नी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रकाशझोत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विकास परशुराम पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. यात केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, सिडको, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लि., तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांना प्रतिवादी केले आहे.
विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यायचे ठरले असेल, तर त्याबाबतचा पत्रव्यवहार न्यायालयात सादर करणे अनिवार्य आहे. आता विमानतळ नामकरणाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नामकरण लढ्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाल्याने याबाबतचा लढा अधिकच तीव्र झाला आहे.




