
जम्मू आणि काश्मीरमधील कटरात वैष्णोदेवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे भूस्खलनात ३० जणांचा मृत्यू
जम्मू आणि काश्मीरमधील कटरात वैष्णोदेवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे भूस्खलनात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाच्या दुसऱ्या दिवशी मृतांची संख्या वाढली आहे. मंगळवारी (२६ ऑगस्ट) दुपारी ३.०० वाजता कटरा येथील अर्धकुंवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ मोठे भूस्खलन झाला. काही वेळातच ८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले, तर २० जण जखमी झाल्याचे वृत्त होते. आता मृतांची संख्या ३० वर पोहोचली आहे. जम्मूत आजही मुसळधार पाऊस आणि ढगफुटीचा धोका कायम आहे.
भूस्खलनानंतर मोठ्या प्रमाणात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली सापडलेल्या लोकांना शोधून रुग्णालयात नेण्यात येत आहे. भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि एनडीआरएफचे जवान लोकांना वाचवण्यात अथक परिश्रम घेत आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी लोक गाडले गेले जाण्याची शक्यता आहे.
मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत तीन पुलांचे नुकसान झाले आहे. भूस्खलनामुळे माता वैष्णोदेवीची यात्रा तात्पुरती स्थगित आली आहे. जम्मूमधील पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या विनाशात कठुआ येथील रावी पुलाचा एक भाग वाहून गेला आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरने २२ सीआरपीएफ जवान, ३ स्थानिक नागरिक आणि एका सीआरपीएफ श्वानांला वाचवण्यात आले आहे