
बळीराज सेनेतर्फे कोकणात माडावर चढणे व नारळ पाडण्याचे प्रशिक्षण
कोकण म्हणजे नारळी आणि पोफळीचे माहेरघर. उंच उंच नारळाची आणि पोफळीची झाडे पाहून कोकणचे वैभव अधिक वाढते पण याच झाडावर चढणारे व नारळ सुपारी पाडून झाड सफाई करणारे कुशल कामगार मिळणे कठीण झाले आहे. कोकणातील गुहागर, दापोली, रत्नागिरीसह अन्य ठिकाणी नारळाच्या बागा मोठ्या आहेत. कोकणात व तळ कोकणात मात्र आता या बाबतीतील कुशल कामगार मिळत नाहीत यासाठी बळीराज सेनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी पुढाकार घेत याकडे व्यवसाय आणि रोजगाराचे साधन म्हणून पाहता यावे यासाठी कोकणातील कृषी क्षेत्रतात आवड असणाऱ्या युवकांना (वयोगट १८ ते ३०) उत्तम प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे.
याचा मूळ उद्देश रोजगार निर्मिती आहे. कोकण परिसरात आज अनेक अशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. साधारणपणे एक कुशल कामगार महिना २५ हजार रुपये सहज उत्पन्न प्राप्त करू शकतो, असा दावा पराग कांबळे यांनी केला आहे. यासाठी बळीराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी सांगितले.