
रत्नागिरीत लवकरच ’ई-बसेस’
रत्नागिरी जिल्ह्यात एसटी महामंडळाची ई-क्रांतीकडे आगेकूच सुरू झाली आहे. लवकरच ताफ्यात ३० प्रदूषणरहित ई-बसेस दाखल होणार आहेत. यामुळे डिझेलवरील लाखो रुपयांचा खर्च वाचणार असून प्रवाशांना प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल. एसटी महामंडळाने प्रदूषण आणि वाढत्या खर्चावर मात करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. डिझेलवरील खर्चाला पर्याय म्हणून ई-बसेस सोबतच सीएनजी बसेसचा वापरही वाढवला जात आहे.
ई-बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महावितरण कंपनीकडून हे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. पहिले चार्जिंग स्टेशन रत्नागिरीतील माळनाका आगारामध्ये काम सुरू झाले आहे. पुढील टप्प्यात खेड व दापोली आगारांमध्येही लवकरच चार्जिंग स्टेशन्स तयार होतील, त्यानंतर चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होताच टप्प्याटप्याने या ३० ई-बसेस एसटीच्या ताफ्यात समाविष्ट होतील, असे राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.
अलीकडे एसटीचा कायापालट सुरू झाला आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीमध्ये आता चांगल्या गाड्यांची भर पडत आहे. यामुळे प्रवाशांचा एसटीकडे कल वाढत असून उत्पन्नातही वाढ होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुमारे ७२० बसेस धावत आहेत. ज्यात शिवशाही, स्लीपर आणि सिटी बसेसचा समावेश आहे. एमआयडीसीच्या सहकार्याने येथील अनेक बसस्थानके हायटेक केली जात असल्याचे सांगितले.www.konkantoday.com




