
चाकरमानी’ नव्हे तर ‘कोकणवासीय’; शासनाचे लवकरच परिपत्रक!
मुंबई : कोकणातून मुंबईसह अन्य शहरांत स्थलांतरित झालेल्या नागरिकांना वर्षानुवर्षे ‘चाकरमानी’ संबोधले जात होते. मात्र हा शब्द अवमानकारक असल्याने तो हटवून त्याऐवजी ‘कोकणवासीय’ असा शब्द वापरा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले.
लवकरच याविषयीचे परिपत्रक काढण्यात येणार आहे.
नुकतीच मुंबई-गोवा महामार्गाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत कोकणवासीयांच्या काही संघटनांनी ‘चाकरमानी’ हा शब्द अपमानकारक वाटत असल्याने सरकारी कागदपत्रे आणि शासकीय कामकाजात त्याऐवजी कोकणवासीय हा शब्द वापरण्याची आग्रही मागणी केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी या बैठकीत यापुढे ‘चाकरमानी’ शब्दाऐवजी ‘कोकणवासीय’ म्हणून संबोधण्याबाबतचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. लवकरच शक्य झाले तर गणेशोत्सवापूर्वीच याबाबतचे शासन परिपत्रक काढले जाणार आहे.
काही संघटनांचा आक्षेप
अनेक दशकांपासून कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील नागरिक कामाच्या, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे ‘चाकरमानी’ हा मराठी शब्द प्रामुख्याने कोकणातून शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या नागरिकांसाठी रूढ झाला.
विशेषत: शिमगा, गणेशोत्सव, दिवाळी किंवा इतर सणांसाठी हे लोक मोठ्या संख्येने आपल्या गावी परतत असतात. एसटी किंवा रेल्वेने निघणाऱ्या या कोकणवासीयांना रूढ अर्थाने चाकरमानी संबोधले जाते. चाकरमानी हा शब्द ‘चाकर’ (सेवक) आणि ‘मानी’ (मानणारा) यांच्या संयोगातून तयार झाला आहे. यालाच कोकणवासियांच्या काही संघटनांनी आक्षेप घेतला. हा शब्द कमीपणाचा वाटत असल्याने त्यांनी ‘चाकरमानी’ या शब्दावर हरकत घेतली आहे. त्यांच्या मते हा शब्द कोकणवासीयांच्या मेहनतीला आणि स्वाभिमानाला कमी लेखणारा आहे. त्यामुळे या संघटनांच्या मागणीनुसार महायुती सरकारकडून चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासीयांच्या स्वाभिमानाला आणि सांस्कृतिक ओळखीला अधिक सन्मान देण्यासाठी ‘कोकणवासीय’ हा शब्द वापरण्याचा प्रस्ताव पुढे आला.