
मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवानिमित्त अवजड वाहनांवर बंदी
गौरी-गणपतीच्या उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि सुरळित प्रवासासाठी प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, येत्या २३ ऑगस्टपासून १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेल्या अवजड वाहनांना महामार्गावर प्रवास करण्यास परवानगी नसेल. गणेशोत्सव २७ ऑगस्ट रोजी सुरू होणार असून, उत्सवाच्या काळात होणारी वाहतूक लक्षात घेता, २३ ते २९ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत या बंदीचा कालावधी लागू राहणार आहे.
उत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी निघणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरळित व्हावा, यासाठी २ ते ४ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत तसेच ६ ते ८ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंतही महामार्गावर अवजड वाहनांचा प्रवेश बंद राहणार आहे.
प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगितले आहे, तसेच वाहनचालकांनी बंदीची माहिती लक्षात ठेवून मार्ग अवरुद्ध होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.
*




