
आबलोलीत सिमेंट बल्कर अपघातात रस्त्यालगतची जमीन खचली; घराचे नुकसान
भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी अपघात स्थळी दिली भेट
गुहागर : तालुक्यातील आबलोली या विकसनशील बाजारपेठेमध्ये जयगड खाडीवरील नियोजित तवसाळ सांडे लावगण या पुलाच्या कामाकरता सिमेंट वाहतूक करणारा ४५ टनी सिमेंट बल्कर रस्त्यालगत उभा असताना मुख्य रस्त्यालगतची जमीन खचल्याने कलंडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी जिथे बल्कर कलंडला आहे तिथे विनोद कदम यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून सावर्डे तवसाळ या मुख्य रस्त्यावरील आबलोली बाजारपेठेतील संरक्षक भिंत सुद्धा या बल्करच्या धक्क्याने जमिनदोस्त झाली आहे.
या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नीलेश सुर्वे यांनी तात्काळ अपघातस्थळी भेट दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्या घराला धोका निर्माण झाला आहे त्या ठिकाणी भेट देऊन घरमालक विनोद कदम आणि कुटुंबीयांना दिलासा दिला. श्री. सुर्वे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता योगेश थोरात, गजेंद्र सकपाळ, दीपक दणाने अशोका बिल्डकॉन कंपनीचे प्रतिनिधी जगन्नाथ काळे, ॲड. विशाल दुबे यांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलावत अपघात झालेल्या बल्करपासून कोणताही धोका होऊ नये याकरता तेथे रात्रभर उपस्थित असणारे आबलोली गावचे पोलीस पाटील महेश भाटकर, ग्राम विकास अधिकारी सुर्यवंशी, तलाठी विनोद जोशी, पोलीस बीट अधिकारी किशोर साळवी, अमोल गायकवाड यांच्या समवेत एकत्रित चर्चा केली. कंपनीच्या प्रतिनिधींना नुकसानग्रस्त घराची पाहणी करून झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्यासाठी समन्वय करून दिला. त्याचबरोबर येणाऱ्या गौरी गणपतीच्या सणानिमित्ताने आबलोलीसारख्या विकसिनशील बाजारपेठेत होणारी वाहतुकीची गर्दी आणि कोंडी लक्षात घेऊन या ठिकाणी तातडीने संरक्षक गोष्टींचे आवश्यक ते नियोजन करण्यास श्री. सुर्वे यांनी सांगितले आहे.




