
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या २५०० फेऱ्यांचे नियोजन
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार असून या चाकरमानी मोठ्या संख्येने एसटीने कोकणात दाखल होणार आहे. या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी २५०० गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
प्रवाशांना ग्रुप बुकिंगची सुविधासुद्धा करण्यात आली आहे. तसेच तिकीट बुकिंगसाठी रा. प. बसस्थानकावर, खासगी एजंट यांचेमार्फत किंवा मोबाईल ॲपद्वारे बुकिंगची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणपती परतीच्या वाहतुकीसाठी ११ ऑगस्टपासून आगाऊ आरक्षण सुरू झाले. त्यामुळे बोरिवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, विरार, भांडूप, भाईंदर या मार्गावरून आरक्षणाला प्रतिसाद मिळू लागला आहे. सर्व आगारातून २३ ऑगस्टपासून ७ सप्टेंबर या कालावधीत बोरिवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, विरार, भांडूप, भाईंदर या मार्गावर बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.