सहा जिल्ह्यांतील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातून केली अटक

रक्कम दामदुप्पट करून देण्याचे प्रलोभन दाखवून राज्यातील सहा जिल्ह्यांतील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.प्रदीप रवींद्र गर्ग असे त्याचे नाव असून, तो मूळचा मिरा रोड येथील राहणारा आहे.गर्ग याने धाराशिव, रत्नागिरी, सोलापूर, हिंगोली, लातूर आणि सातारा या सहा जिल्ह्यांतील हजारो नागरिकांना गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे दाखल गुन्ह्यात त्याला अटक झाली, मात्र चिपळूण न्यायालयात त्याची जामिनावर सुटका झाली. जामीन आदेशातील अटी-शर्तींचे तो पालन करत नव्हता, तसेच न्यायालयासमोर हजरही होत नव्हता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिलेला जामीन रद्द करून त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावणी करण्याचे आदेश दिले, मात्र तो फरार झाल्याने सापडून येत नव्हता.तो मूळचा मिरा रोडमधील निवासी असल्याने यासंदर्भात पोलिस महासंचालकांनी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तांना त्याचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार आयुक्त निकेत कौशिक, उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविराज कुराडे यांच्या पथकाने शोध घेऊन त्याला उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथून शनिवारी ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button