स्वरनिनाद’तर्फे ११ ऑगस्टला गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम

१९० विद्यार्थी सादर करणार कलाविष्कार

रत्नागिरी : गेली ८० वर्षे अविरत रत्नागिरीकरांसाठी संगीत सेवा देणाऱ्या स्वरनिनाद संगीत विद्यालयाचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम सोमवारी (११ ऑगस्ट) सायंकाळी ४ ते ८ यावेळेत स्वा. सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे.

रत्नागिरीत सांगितिक चळवळ सुरू करण्यात कै. विनायकबुवा रानडे, कै. भालचंद्रबुवा रानडे आणि कै. बाळासाहेब हिरेमठ यांचे मोलाचे योगदान आहे. कै. विनायकबुवा रानडे आणि कै. भालचंद्रबुवा रानडे यांनी ८० वर्षांपूर्वी या संगीत विद्यालयाची स्थापना केली. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे गुरुपौर्णिमा कार्यक्रम केला जातो. सध्या स्वरनिनाद अकादमीचे वर्ग माळनाका आणि शेरेनाका येथे सुरु आहेत. यात सुमारे २५० विद्यार्थी तबला, संवादिनी, पखवाज, बासरीचे शास्त्रीय शिक्षण घेत असून, त्यांना विजय रानडे, केदार लिंगायत, मंगेश चव्हाण, सौ. प्रज्ञा काळे, प्रसन्न जोशी संगीताचे शिक्षण देत आहेत.

या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध संवादिनीवादक अनंत जोशी, ज्येष्ठ ऑर्गनवादक विलास हर्षे, सुप्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर, ॲड. राजशेखर मलुष्टे, ज्येष्ठ निवेदिका निशा काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात संगीत विद्यालयातील सुमारे १९० विद्यार्थी संवादिनी, बासरी, तबला, पखवाज वादन करणार आहेत. या कार्यक्रमाला संगीत प्रेमींनी उपस्थित रहावे आणि मुलांचे कलाविष्कार पाहून त्यांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन स्वरनिनाद संगीत विद्यालयाचे विजय रानडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button