
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन, लोकमान्य टिळक जन्मस्थळी ध्वजारोहण
रत्नागिरी, दि.१ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळी त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. याठिकाणी असणाऱ्या ध्वजस्तंभावर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहणही करण्यात आले.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे’, असे ब्रिटीशांना ठणकावून सांगताना लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य संग्रामाचे चैतन्य निर्माण केले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळावर असणाऱ्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी अभिवादन केले. याठिकाणी झालेल्या ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हटले. आतमधील लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच अर्धपुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यांनतर लोकमान्यांच्या जीवन चरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणी केली.
प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पुरातत्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनीही यावेळी अभिवादन केले.