
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची होणार आरोग्य तपासणी
जिल्ह्यात एकूण २० तपासणी केंद्रांची उभारणी
रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्या सूचनेनुसार, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदशानाखाली गणेशोत्सव २०२५ निमित्त रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी महामार्गावरील प्रमुख ठिकाणी तसेच रेल्वे स्थानकांवर आरोग्य तपासणी पथके तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन बैठकीत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एकूण जिल्ह्यात एकूण २० तपासणी केंद्र उभारण्यात येणार असून, ही पथके २२ ऑगस्टपासून कार्यरत होणार असून ७ सप्टेंबरपर्यंत सतत कार्यरत राहतील.
ही तपासणी पथके महामार्गावरील चेकपोस्ट, प्रमुख फाटे तसेच रेल्वे स्थानकांवर कार्यरत राहतील. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चेकपोस्ट ठिकाणी पेंडॉल उभारण्यात येतील. त्या ठिकाणी आरोग्य विभागासह सर्व संबंधित विभागांचे कर्मचारी तैनात राहून तपासणी करतील.
तालुकानिहाय पथक ठिकाणे पुढीलप्रमाणे : खेड (३ केंद्रे) – गुणदे फाटा (पेंडॉल), भरणेनाका (पेंडॉल), खेड रेल्वे स्टेशन. चिपळूण (६ केंद्रे)- पेढे सवतसडादर्शन (पेंडॉल), कळंबस्ते तिठा (पेंडॉल), बहादुरशेख नाका (पेंडॉल), अलोरे घाटमाथा (चेकपोस्ट), दहिवली फाटा (पेंडॉल), चिपळूण रेल्वे स्टेशन. संगमेश्वर (५ केंद्रे)- तुरळ (पेंडॉल), एसटी स्टॅण्ड जवळील ब्रिजचे वळण (पेंडॉल), वांद्री (पेंडॉल), देवरुख मुर्शी (चेकपोस्ट), संगमेश्वर रेल्वे स्टेशन. रत्नागिरी (३ केंद्रे) – हातखंबा तिठा (पेंडॉल), पाली (पेंडॉल), रत्नागिरी रेल्वे स्टेशन. लांजा (२ केंद्रे) – वेरळ (पेंडॉल), कुवे गणपती मंदिर समोर (पेंडॉल). राजापूर (१ केंद्र)- राजापूर एस.टी. स्टॅण्ड (पेंडॉल). एकूण तपासणी केंद्रे- २०
प्रत्येक पथकात प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, आवश्यक औषधी साठा तसेच प्रथमोपचार सुविधा उपलब्ध राहील. तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी प्रत्येक केंद्रावर एक ॲम्बुलन्सची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
या उपक्रमाद्वारे चाकरमान्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी गणेशोत्सव काळात या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी केले आहे.




