
गणपती उत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणारी खास “शिवसेना एक्सप्रेस” रेल्वे धावणार
गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी लक्षात घेता यंदाही मुंबईहून कोकणात जाणारी खास “शिवसेना एक्सप्रेस” रेल्वे सुरू करण्यात आली आहे.या गाडीचा प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही कोकणात आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विशेष सेवेमुळे हजारो चाकरमानींना कोकणात पोहोचण्याची मोठी मदत होणार आहे.
प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे, त्यामुळे कोणतीही तिकीट किंमत आकारली जाणार नाही. ही सेवा केवळ चाकरमान्यांच्या सोयीसाठी असणार आहे.बुकिंग अहस्तांतरणीय आहे, म्हणजेच एकदा नाव नोंदवल्यानंतर ते इतर कुणालाही दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रवाशांनी स्वतःच्या नावानेच बुकिंग करणे आवश्यक आहे. शिवाय, सरकारी ओळखपत्र अनिवार्य आहे. प्रवासाच्या वेळी अधिकृत ओळखपत्र (जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी) सादर करणे बंधनकारक आहे.
२५ ऑगस्ट २०२५ रोजी (सोमवार) सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून कुडाळ रेल्वे स्थानकासाठी विशेष रेल्वे सेवा सुरु होणार आहे. गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी ही विशेष रेल्वे चालवण्यात येत आहे.
प्रवासासाठी सीट बुकिंग आवश्यक असून, इच्छुक प्रवाशांनी ९१८६५२४८९९६४, ९१८६५२२७२०३१ या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.