ओला, उबर, रॅपिडो विसरा! थेट राज्य सरकारच सुरु करणार खास सेवा!

अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा ही आता शहरातील आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. ओला, उबेर, रॅपिडो या खासगी कंपन्यांच्या वाहनांना रोज मिळत असलेला प्रतिसाद हे याचे प्रमुख उदाहरण आहे.पण, या कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी संप करत प्रवाशांना वेठीस धरले होते. तसंच या कंपनीतील चालकांची वागणूक, प्रवासामधील सुरक्षितता हे मुद्दे देखील अनेकदा चर्चेच असतात. या सर्वांवरचा उपाय राज्य सरकारनं शोधला आहे. राज्य सरकार अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

कसे असेल अ‍ॅप?

प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून मराठी तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.या ॲपला जय महाराष्ट्र, ‘महा -राईड’, ‘महा-यात्री’ किंवा ‘महा-गो’ यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री (एकनाथ शिंदे आणि अजित पवार) यांच्या अंतिम मान्यतेने हे सरकारी ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमाअंतर्गत अ‍ॅप विकसित करण्यासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ आणि ‘मित्र’ या संस्थेसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश यात असून लवकरच अ‍ॅप तयार होणार आहे, असंही सरनाईक यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button