
कोकणच्या माणसाची कोणाला पडलेलीच नाहीय…’, महामार्गावर खड्डेच खड्डे; मनसे नेते नितीन सरदेसाई
मुंबई-गोवा महामार्गाचे काम तब्बल १४ वर्षांपासून रखडले आहे. दरवेळी सरकारकडून नवीन डेडलाईन दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बदललेली नाही. पावसाळा सुरू होताच महामार्गाची अवस्था आणखीच बिकट होत असते.अशातच या महामार्गावरील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी तो शेअर करत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
नितीन सरदेसाई हे कोकणातून मुंबईकडे परत येताना त्यांनी महामार्गावरील अवस्थेचा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.
या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, “मी आज कोकणातून मुंबईला परत जात असताना लांजा, संगमेश्वर, महाडजवळील लोणेरे आणि इतरही अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था पाहिली. ती पाहून अक्षरशः संताप येतोय. सरकार बदललं, मंत्री बदलले, अधिकारी बदलले, आश्वासनं मिळाली… पण या महामार्गाचं चित्र काही बदललं नाही. प्रत्येक वेळीच्या पावसानं हा रस्ता वाहून जातो. कोकणच्या माणसाची मात्र कोणालाच गरज वाटत नाही, असंच दिसतंय!याआधी, मनसे नेते अविनाश जाधव यांनी कशेडी बोगाद्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. “हजारो कोटी खर्च केल्यानंतरही देखील आमच्या कशेळी भोगद्यामध्ये लाईट नाही.हे सरकार आणखी किती कोकणी माणसाचे जीव घेणार आहे?”, असा सवाल जावध यांनी उपस्थित केला होता.
कशेडीच्या बोगद्यात दोन मोठे बोगदे बांधण्यात आले असून, त्या दोन्ही बोगद्यात लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही. दोन्ही बोगद्यात खूप अंधार आहे. अशा परिस्थितीत बोगद्यात एखाद्या वाहनाचा किती मोठा अपघात होऊ शकतो? गेल्या १८ ते २० वर्षापासून या महामार्गाचे काम सुरु आहे. या काळात विविध अपघातात अनेकांना त्यांचा जीव गमावलाय, कोणाचे हात, कोणाचे पाय तुटलेत,” असे जाधव म्हणाले होते.
कोकणवासीय त्रस्त
मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०१० पासून सुरू आहे. मात्र २०२५ उजाडला तरी अजूनही संपूर्ण महामार्ग पूर्ण झालेला नाही. रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो आहे. उखडलेला डांबर, खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचे वाढते प्रमाण या सगळ्याचा कोकणवासीयांनाही त्रास होत आहे.