
तळवडे येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह अर्जुना नदीत सापडला
राजापूर तालुक्यातील तळवडे (बौद्धवाडी) येथील सचिन जाधव उर्फ बावा (वय ४२) या युवकाचा मृतदेह अर्जुना नदीच्या काठी पुलाजवळ गौंड चिरफळीचा माळ या परिसरात बुधवारी दुपारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सचिन जाधव हे शनिवार, दिनांक १९ जुलै २०२५ पासून बेपत्ता होते. त्याचा शोध ग्रामस्थांसह नातेवाईकांकडून सुरू होता. मात्र, कुठलाही थांगपत्ता न लागल्याने त्याची बहीण गौतमी नंदकुमार कांबळे (रा. जुगाई, येळवण) यांनी रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू असतानाच अर्जुना नदीच्या पुलाजवळील वडचाआई मंदिर परिसरात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.सदर मृतदेह पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाडगे आणि रामदास पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने नदीतून बाहेर काढला.