
जम्मू कश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करा; राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी!
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे. हे अधिवेशन सुरू होण्याआधी लोकसभेचे विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सरकारला संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी विधेयक आणण्याची विनंती केली आहे. जम्मू आणि कश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी कायदेशीर आहे आणि ती घटनात्मक आणि लोकशाही अधिकारांवर आधारित आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत जम्मू आणि कश्मीरच्या लोकांनी पूर्ण राज्यत्व बहाल करण्याची मागणी केली आहे. भूतकाळात अशी अनेक उदाहरणे आहेत, जेव्हा केंद्रशासित प्रदेशांना राज्यांचा दर्जा देण्यात आला होता. एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात असे कोणतेही विधेयक आणण्याची केंद्र सरकारची योजना नाही. संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होत आहे.
केंद्र सरकारने 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे विभाजन करून त्यांना दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये रूपांतरित केले. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले आहे की जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा लवकरात लवकर पुनर्संचयित केला जाईल.