
कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना चॉकलेट मधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून लुटणारा आरोपी अटकेतआरपीएफच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघड
कोकण कन्या एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २०११२) मध्ये प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या एका आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) गुन्हे आणि गुप्तचर शाखेने मोठ्या सतर्कतेने पकडले. आरोपीकडून चोरी केलेला ऐवज जप्त करण्यात आला असून, बेशुद्ध अवस्थेतील दोन प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दि. ९ जुलै रोजी हि कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी आरपीएफ रत्नागिरीचे निरीक्षक संजय वत्स, पीआर अमोल पाटील आणि पीआर कोकरे हे कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये गस्तीवर होते. दुपारी संगमेश्वर रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबली असता, मोहम्मद उस्मान घनी आणि त्याचा मुलगा वसीम उद्दीन घनी (वय २५) हे मागील जनरल डब्यातून संशयास्पद रित्या उतरून स्लीपर कोचमध्ये चढताना दिसले. आरपीएफ पथकाला त्यांचा संशय आला आणि त्यांनी स्लीपर कोच S6 मध्ये त्यांना थांबवले. त्यांच्याकडे तीन मोबाईल फोन आढळले, ज्याबद्दल ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन चिपळूण स्थानकावर उतरवले. चिपळूण येथे आरपीएफने त्यांची कसून चौकशी केली असता, वसीम उद्दीन घनीने सांगितले की तो बिहारचा रहिवासी असून, मुंबईतील अंधेरी येथील एका बांधकाम साईटवर काम करतो. त्याने सांगितले की, दादरमध्ये भेटलेल्या ‘राजू’ नावाच्या व्यक्तीने त्याला काही चॉकलेट्स देऊन मडगावला पाठवले होते. ‘राजू’च्या सांगण्यावरून तो ८ जुलै २०२५ रोजी मडगाव रेल्वे स्थानकावरून जनरल कोचमध्ये प्रवास करत होता.
प्रवासादरम्यान त्याने आपल्या शेजारी बसलेल्या दोन अनोळखी व्यक्तींशी मैत्री केली. त्यानंतर त्याने त्यांना ETIVAN TAB मिसळलेली दोन चॉकलेट्स दिली. रत्नागिरी स्टेशनजवळ दोन्ही प्रवासी बेशुद्ध पडल्यानंतर त्याने त्यांचे दोन मोबाईल आणि एका प्रवाशाची पर्स चोरली. जेव्हा ट्रेन संगमेश्वर स्थानकावर थांबली, तेव्हा तो डबा बदलून स्लीपर कोचमध्ये जात असतानाच त्याला पकडण्यात आले.
आरपीएफ रत्नागिरीचे निरीक्षक संजय वत्स यांनी तात्काळ आरपीएफ पनवेल येथील उपनिरीक्षक विद्यानंद तायडे यांना माहिती दिली. त्यानुसार बेशुद्ध पडलेल्या प्रवाशांना पनवेल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची नावे गोकुळ हिराजी तोता (रा. अमरावती) आणि अशोक कुमार राजभर (रा. पश्चिम बंगाल) अशी आहेत. सध्या ते दोघेही बेशुद्ध अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी येथे आरोपीची पुन्हा चौकशी केली असता, त्याने विषारी औषध देऊन चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडील बॅगेतून दोन बेशुद्ध प्रवाशांकडून चोरलेले कपडे, दोन मोबाईल फोन (ओप्पो आणि व्हिवो), एका प्रवाशाच्या खिशातील पर्स ज्यात ७१० रुपये रोख, अशोक कुमार राजभर यांचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पॅन कार्ड आणि तीन एटीएम कार्ड तसेच चॉकलेटच्या प्लास्टिक पिशवीत गुंगीचे औषध सापडले. हे सर्व साहित्य निरीक्षक संजय वत्स यांनी दोन पंचांच्या उपस्थितीत जप्त केले.
आरपीएफ पोस्ट रत्नागिरी येथे निरीक्षक सतीश विधाते आणि निरीक्षक संजय वत्स यांनी गुन्हे शाखा शहर पोलिस रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने तपास आणि आवश्यक कागदपत्रे तयार केल्यानंतर आरोपी आणि जप्त केलेला ऐवज गुन्हे शाखा शहर पोलिसांच्या स्वाधीन केला.
आरपीएफ रत्नागिरीच्या गुन्हे गुप्तचर शाखेचे निरीक्षक संजय वत्स आणि त्यांच्या पथकाने, ज्यात पीआर अमोल पाटील आणि पी.आर. कोकरे यांचा समावेश आहे, यांनी दाखवलेली तत्परता आणि दक्षतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला आणि आरोपीला चोरीच्या ऐवजासह रंगेहाथ पकडण्यात यश आले.