
राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन
महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!, असे ट्विट करत संजय राऊत यांनी राज ठाकरे हे पाच तारखेला काढत असलेल्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.दरम्यान, उद्धव ठाकरे हे सात तारखेला होणार कृती समितीच्या मोर्चात सहभागी होणार होते. मात्र, त्यांनी अचानक आपला निर्णय का बदलला? पडद्यामागे नेमकं काय घडलं? याचे उत्तर संजय राऊत यांनी दिले.
संजय राऊत म्हणाले, आम्ही कृती समितीच्या आंदोलनात सहभागी होण्याची तारीख मातोश्रीवर जाहीर केली. आमची बैठक त्यावेळी सुरू होती. मी जेव्हा बैठकीतून बाहेर आलो तेव्हा राज ठाकरेंचा मला फोन आला. त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरेंनी सात तारखेला आंदोलन करायचे ठरवले आहे तर मी सहा तारखेची घोषणा केली आहे. मराठी माणसाचे आणि मराठी भाषे संदर्भातील दोन मोर्चे निघणे हे बरं दिसत नाही. जर एकत्र आंदोलन झाले तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल.’पुढे बोलताना राऊत म्हणाले, मी लगेच उद्धवजींना सांगितले की, मनसेप्रमुखांचा फोन आला होता. त्यांनी अशी भूमिका मांडली आहे. उद्धवजी यांनी सांगितले की मराठी माणसाचे ऐक्य दिसणे गरजेचे आहे. आपण मराठी माणसं मराठी भाषेवर हिंदीच्या सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे. आणि वेगळा मोर्चा काढण्याविषयी भूमिका नाही.