
सुशोभित केलेल्या रत्नागिरी रेल्वेस्थानकात गुरांचा मोठ्या प्रमाणावर वावर.
रत्नागिरी रेल्वे स्टेशनला विमानतळाची अनुभूती यावी, यासाठी नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. दिमाखदारपणे उभ्या राहिलेल्या रेल्वेस्थानकावर मात्र प्रवाशांना होणारा मनस्ताप कमी झालेला नाही. नव्याने उभारण्यात आलेल्या छताची गळती सुरुच असून उनाड गुरांनी या रेल्वेस्थानकात निवारा केला आहे. जिकडे- तिकडे पडलेल्या शेणामुळे दुर्गंधीही येत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्वाचे स्थानक म्हणून रत्नागिरी रेल्वेस्थानक म्हटले जाते. एक्स्प्रेस, सुपरफास्ट आदी सर्वच गाड्या या रेल्वेस्थानकावर थांबत असतात. पर्यटकही रस्ते मार्गाने येण्यापेक्षा रेल्वे मार्गानेच कोकणात येत असतात. हाच विचार करुन रत्नागिरी रेल्वे स्थानक अद्ययावत करणे व सुशोभित करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वीच या रेल्वे स्थानकाच्या नव्या कामाचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात या रेल्वे स्थानकाच्या कामाची दुर्दशा समोर आली आहे. तसेच उनाड फिरणार्या गुरांनीही या रेल्वे स्थानकावर आसरा घेतला आहे. त्यामुळे प्रवासी मात्र या सर्व मनस्तापामुळे पुरते हैराण झाले आहेत.www.konkantoday.com