
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त ‘कृत्रिम बुध्दीमत्ता कार्यालयीन उपयोग’ कार्यशाळा कृत्रिम बुध्दीमत्ता शत्रू नसून मित्र – विनायक कदम.
रत्नागिरी, दि. 26 : कृत्रिम बुध्दीमत्ता हे तंत्रज्ञान वापरुन कार्यालयीन कामकाज कमी वेळात प्रभावीपणे करता येते. त्यामुळे एआय हे शत्रू नसून मित्र आहे, असे एमकेसीएलचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा कार्यालयीन उपयोग या विषयावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवनात आज कार्यशाळा झाली. यावेळी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा जात पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के, महात्मा जोतिबा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विठ्ठल नवरु, पोलीस निरीक्षक पवनकुमार चौधरी आदी उपस्थित होते.
श्री कदम यांनी संगणकीय सादरीकरण करतानाच काही प्रात्याक्षिक करुन दाखवून कार्यालयीन कामकाजामध्ये कृत्रिम बुध्दमत्तेचे महत्त्व प्रभावी असल्याचे सांगितले. रनवे, पायलट, चॅट जीपीटी, भाषिनी, डेमो एआय, हेड्रा, ग्रोक एआय, डीप सीक, जनरेटीव्ह एआय आदींचा वापर कार्यालयीन कामकाजामध्ये कसा करायचा त्याबाबत सविस्तर माहिती दिली. मजकूर टायपिंगसाठी गुगल डॉक्स, गुगल लेन्स, शुध्दलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यासाठी ग्रामरली, त्याचबरोबर संगणकीय सादरीकरणासाठी एआय पीपीटी, प्रेझेटेंशन.एआय, आर्ट वर्कसाठी कॅनवा, 123 ॲप याबाबतची माहिती दिली.
दैनंदिन प्रशासकीय कामकाजामध्ये कमी वेळेत प्रभावीपणे काम करण्यासाठी एखादे व्हीजन डॉक्युमेंट सारखे दस्तावेज अवघ्या काही मिनिटात तयार करण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर चांगल्याप्रकारे करता येऊ शकते. त्यासाठी काटेकोरपणे त्याच्याकडून काम करुन घेता आले पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत आशिष कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राजक्ता मराठे यांनी केले. कार्यक्रमास वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया मोरे, गृहपाल दिपक जाधव, गृहपाल रविंद्र कुमठेकर, निरीक्षक अमोल पाटील, लिपीक संतोष खेडेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.000