
रसायनमिश्रित पाणी सोडल्याने ’साफयिस्ट’ला उत्पादन थांबवण्याचे आदेश.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे येथील नदीत शनिवारी टँकरद्वारे रसायन मिश्रित पाणी सोडले गेल्याच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करताना गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील ’साफयिस्ट कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला सोमवारी रात्री नोटीस बजावत उत्पादन तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मंडळाच्या या कारवाईने औद्योगिक क्षेत्रासह कामगार तसेच परिसरातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच मंडळाने थेट कारवाई करताना यापूर्वीही वारंवार नियमभंग करत पर्यावरणास गंभीर इजा केल्याचे कारण स्पष्ट केले आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कामथे-हरेकरवाडी येथे शनिवारी रात्री एका धाब्याजवळील नाल्याजवळ ५ टँकर एका ओळीत उभे होते. काही तरुण रात्री खेकडे पकडण्यासाठी नदीकाठी गेले असता त्यांना ३ इंचाच्या पाईपद्वारे टँकरमधून रसायन मिश्रित पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे लक्षात आल्याने ग्रामस्थांच्या मदतीने २ टँकर अडवले. तर ३ टँकर घटनास्थळावरून पसार झाले. यावेळी भरलेले टँकर आणि त्यावरचे चालकही पळून गेले. पोलीस प्रशासनाने हे दोन्ही टँकर ताब्यात घेऊन पंचनामा केला. त्यानंतर या बाबतचा तपास करतानाच हे टँकर गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीतून आले असल्याचे पुढे आले.www.konkantoday.com