
सैतवडे गावात ‘रावडी जनार्दन’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू; विजय देवरकोंडा आणि कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत
रत्नागिरी:

रत्नागिरी: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित ‘रावडी जनार्दन’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सैतवडे गावात जोरदार सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून गावातील गुंबद ग्रामपंचायत हद्दीमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश हे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रीकरणासाठी मोठा बंदोबस्त (फोर्स फाटा) गावात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, सैतवडे गावातील दी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे.
‘रावडी जनार्दन’ या चित्रपटाचा बेस १९०० सालातील असून, त्यावेळच्या ब्रिटिशकालीन माहितीवर आधारित कथानक तयार करण्यात येत आहे. सैतवडे येथील चित्रीकरण पूर्ण झाल्यावर पुढील शूटिंग गावाशेजारच्या वरवडे येथे होणार आहे. हे चित्रीकरण पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील लोक मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहेत. उद्या, सैतवडे गावातील बोरसही मोहल्ला येथेही या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.
जवळपास साठ ते सत्तर वर्षांपूर्वी सैतवडे गावात ‘सागर प्रेमी सैतवडे’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. त्यानंतर इतक्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा गावात चित्रपट निघत असल्याने स्थानिकांमध्ये मोठी उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण आहे.




