
आषाढी वारीबद्दल महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्यांनी भाष्य करू नये : अमृत गोरे.
रत्नागिरी : पंढरीची वारी ही शिस्तप्रिय असते. हजारो वारकरी ऊन, वारा, पाऊस झेलत, पायी चालत असतात. ट्रॅफिक जॅम सोडाच पण ॲम्ब्युलन्स आली तरी लाखो वारकरी एका मिनिटात त्या ॲम्ब्युलन्सला जायला वाट मोकळी करून देतात, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या आषाढी वारीबद्दल महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्यांनी भाष्य करू नये, अशा शब्दांत रत्नागिरीतील युवा नेते आणि विठ्ठल भक्त अमृत गोरे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. युवा नेते अमृत गोरे हे आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून अनेक वर्षे न चुकता पंढरीची वारी करत आहेत. त्यामुळे त्यांना वारकरी संप्रदायाचा जवळून परिचय आहे. समाज कार्यातही ते नेहमी पुढे असतात. अशा परिस्थितीत अबू आझमीची यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या ‘वारी’ वर बोलण्याचा काहीही अधिकार नाही आणि आम्ही हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्र सहनशील आहे, पण शिवरायांचं रक्तही आमच्यात आहे, हे विसरू नये, असेही गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.