बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला’ का नाचतोय?” संजय राऊत यांची एकनाथ शिंदे वर टीका


शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईत शिंदे-ठाकरे गटांमध्ये युद्ध चांगलेच पेटले. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टोकाची टीका केली, तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनीही शिंदेंवर टीकेची झोड उठवली आहे.वरळीतील कार्यक्रमात शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवर ताशेरे ओढले. “हिंदुत्व आणि मराठी माणसांशी विश्वासघात करणाऱ्यांनी आता माझ्याशी युती करायची? किती आगतिक, उतावळे आणि लाचार झाले आहेत हे दिसून येते,” अशा शब्दांत शिंदेंनी टोला लगावला.

शिंदेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही कोणाशी युती करावी हा आमचा प्रश्न आहे, तुमचा नाही. ‘बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला’ का नाचतोय?” असा सवाल करत त्यांनी शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला. “दोन पक्ष एका विचारधारेचे आहेत की नाही, हे तेच ठरवतील. तुमचं यावर एवढं तिळपापड का? फडणवीसांनी तुमचं पायपुसणं केलं आहे, आणि त्यामुळेच तुम्हाला आता झोप लागत नाही,” असेही ते म्हणाले.

शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर “मेलेल्यांना काय मारायचं” असे वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापलं. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “त्यांची भाषा अघोरी विद्येची आहे. ज्यांनी त्यांना आयुष्यभर वाढवलं, त्यांच्याविषयी अशा भाषेत बोलणं, ही संस्कृतीच नव्या भाजप संस्कृतीची आहे. दिल्लीला जाऊन बूट चाटणं, हेच त्यांचं सत्य आहे.”

“लोकसभेत ते मेलेले होते आणि विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर जिवंत झाले. उद्धव ठाकरेंविषयी वापरलेली भाषा आम्ही लक्षात ठेवली आहे. त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button