
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळ्यातील पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती सातासमुद्रापार गेल्या.
कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेली रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळ्यातील पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती सातासमुद्रापार गेल्या आहेत. ग्राहकांची मागणी आणि व्यवसायवृद्धीसाठी ४० वर्षापूर्वी वडिलोपार्जित परंपरा गुळे येथील श्री गणपती कलाकेंद्राने जपली आहे. प्रसिद्ध मूर्तिकार ज्ञानेश कोटकर व नेहल कोटकर यांनी ही किमया केली आहे. त्यांच्या या चित्रशाळेतील ४४ सुबक गणेशमूर्ती नुकत्याच अमेरिकेला रवाना झाल्या.वडिलोपार्जित चित्रशाळेत ज्ञानेश व नेहल कोटकर यांनी पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे ही संकल्पाना राबवली. हलक्या आणि पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती लोकांपर्यंत पोहचाव्यात, हाच उद्देश होता. या व्यवसायात ज्ञानेश यांची पत्नी नेहल यांचे मोठे सहकार्य असते; मात्र या मूर्ती तयार करताना मनुष्यबळही तितकेच महत्त्वाचे होते; पण यावरही मात करून आई-वडिलांसह कुटुंबातील सदस्य मित्रपरिवाराने सहकार्य केले.
गणेशगुळेसारख्या ग्रामीण भागातील कारागिरांसाठी रोजगार निर्मिती झाली. ४०० ते ५०० सुबक गणेशमूर्ती तयार होतात. वर्षभर येथील कारागिरांना काम मिळाले. पाच ते सहा कामगार चित्रशाळेत वर्षभर काम करतात. यामध्ये महिलांचा समावेश जास्त आहे. गणेशमूर्तीसाठी आणलेला कागद वेचून भिजवायला ठेवावा लागतो. या कागदामध्ये फोटोग्राफीचा डिजिटल कागद नसावा. कागद अथवा पुठ्ठा दोन ते तीन दिवस पाण्यात कुजवून घेतल्यानंतर मिक्सर ग्राईंडरवर कागद आणि शाडूची माती असे माध्यम वापरून श्रीगणेश मूर्तीच्या विविध रुपातील सुबक मूर्ती साच्यातून तयार करण्यात येतात. या व्यवसायाला जिल्हा व परजिल्ह्यातूनही मागणी वाढली आहे. मूर्ती नेण्यास किफायतशीर हलक्या असल्याने श्री गणेशभक्तांचा कलही वाढला आहे. ४४ गणेशमूर्ती २ जूनला अमेरिकेत पाठवण्यात आल्या. यावर्षी श्री गणपती कलाकेंद्रातून गुहागर-५०, जैतापूर-५०, लांजा-८० पाठवण्यात आल्या; मात्र ३५० गणेशमूर्ती मुंबईला पाठवण्यात येणार असून, या मूर्ती जुलैमध्ये मुंबईत रवाना होणार आहेत तसेच गणेशगुळे येथील स्थानिक गणेशभक्तांच्या शाडू व लगद्याच्या १०१ गणपतीचे काम सुरू असल्याचे नेहल कोटकर यांनी सांगितले