
धडधाकट लोकांना लाजवेल, असा संदेश तुम्ही आम्हाला देत असता,दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत हस्ते मोफत साहित्य वाटप
*रत्नागिरी, : धडधाकट लोकांना लाजवेल, असा संदेश तुम्ही आम्हाला देत असता. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, ही भूमिका ठेवून शासन, अधिकारी, सर्वजण कार्यरत असतो. तुमच्याकडे बघून आमच्यामध्ये नवी प्रेरणा, नवी ऊर्जा तयार होत असते, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
सामाजिक न्याय अधिकारिता व दिव्यांगजन सक्षक्तीकरण विभाग, भारत सरकार, सामाजिक न्याय विभाग, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन विभाग यांच्यावतीने पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, प्रांताधिकारी जीवन देसाई, महेश म्हाप आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असणाऱ्या योजना, ज्येष्ठ नागरिकांची वैयक्तिक योजना असेल, तीर्थ दर्शन योजना असेल अशा सगळ्या योजनांचा लाभ महाराष्ट्र सरकार तुमच्यापर्यंत पोहोचवताना त्याच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका अतिशय प्रामाणिकपणानं समाज कल्याणचे अधिकारी करताहेत. धडधाकट लोकांना लाजवेल, असा संदेश तुम्ही आम्हाला देत आहात. आयुष्य अडचणीचे असताना त्यावर मात करण्याचा धडा तुम्ही नेहमी देत असता. सगळ्या अडचणींवर मात करुन संदेश देणारा हा कार्यक्रम आहे.
प्रत्येकाला समाजाला काहीतरी देणं लागतं, ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून असे कार्यक्रम करण्यात येत आहेत. जीवनामध्ये पुढचे आयुष्य सुखी समाधानी करण्यासाठी एक विलक्षण प्रेरणा आम्हाला मिळाली. अद्भुतपूर्व आनंद तुमच्या चेहऱ्यावर सगळ्यांना बघायला मिळतोय. याचे वेगळे समाधान आज आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त श्री. घाटे यांनी सर्वांचे स्वागत केले. तर अभिलाषा ढोले यांनी प्रास्ताविक केले.