
ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडणार, नुतन जिल्हाप्रमुख नितीन बगाटे यांचा निर्धार.
रत्नागिरी जिल्हा ड्रग्जमुक्त करावयाचा आहे. यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. जो कोणी विकत असेल त्याची गाठ पोलिसांशी आहे. त्यांचं कंबरडे मोडणार, प्रसंगी आपण स्वतः छापा टाकू, असा इशारा देताना सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शांततामय रत्नागिरी जिल्ह्याला गालबोट लागणार नाही, यासाठी आपले शेवटपर्यंत प्रयत्न राहातील, अशी स्पष्ट भूमिका नव्याने रूजू झालेले जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी केले.चिपळूण शहरालगतच्या कापसाळ येथील माटे सभागृहात शुक्रवारी चिपळूण तालुका सामाजिक सलोखा समिती बैठक पार पडली. या वेळी जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांशी संवाद साधला. या वेळी नागरिकांनी काही समस्या मांडल्या. या समस्यांचे निराकरण केले जाईल, असे श्री. बगाटे यांनी सांगितले. या वेळी व्यासपिठावर शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आदी उपस्थित होते. या वेळी श्री. बगाटे म्हणाले की, सामाजिक सलोखा सभेला तुमच्या सर्वांची उपस्थिती पाहून तुम्हाला ’सॅल्यूट’ आहे. रत्नागिरी जिल्हा शांततामय आहे. इथल्या समाजाला जबाबदारीचं भान आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. महिलांच्या सुरक्षितततेच्या दृष्टीने पोलीस नेहमीच आग्रही राहातील.www.konkantoday.com