
जयगड-वरवडे येथील रस्ते, मोऱ्या वाहतुकीच्या दृष्टीने निर्धोक कराव्यात अनिरुद्ध साळवी यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा येथील वरवडे फाटा ते एसटी पिक अप शेड या भागात, तसेच रीळ केसपुरी भागातील छोटा पूल त्याचप्रमाणे जोड रस्ता या ठिकाणी अतिवृष्टीच्या काळात नित्यनियमाने भयावह पाणी साठते. एखादा तातडीचा रुग्ण किंवा नवागत प्रवासी पावसाच्या पाण्यात वाहून जाऊ शकतो. या पावसाळ्यातही १२ जून रोजी अशी परिस्थिती उद्भवली होती. वरवडे गावातून केसपूरीकडे येताना सुद्धा एक छोटी मोरी धोकादायकरित्या वाहत असते. वरवडे कुंभारवाडा येथील नितीन वासुदेव जोशी यांच्या घराजवळील पुलावरूनसुद्धा पाणी वाहत असते. काही ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा असणारे वृक्षसुद्धा धोका निर्माण करीत आहेत. या धोकादायक ठिकाणांचे सर्व्हेक्षण होवून, तात्काळ उपाययोजना करावी आणि हे रस्ते निर्धोक करावेत, अशी आग्रही मागणी जयगड येथील रहिवासी अनिरुद्ध कमलाकर साळवी यांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन त्यांनी नुकतेच पालकमंत्री सामंत यांना दिले आहे.
या निवेदनात श्री. साळवी यांनी म्हटले आहे की, “जयगड, साखर मोहल्ला, नांदिवडे, चाफेरी, कासारी ही गावे तसेच जयगड फेरीबोट मार्गे जोडली गेलेली गुहागर, चिपळूण या भागातील लोकवस्तीला रत्नागिरीहून आपापल्या भागात येण्या-जाण्यासाठी खंडाळा मार्गे व वरवडे, रीळ मार्गे असे दोनच रस्ते उपलब्ध आहेत. हे रस्ते तसे व्यवस्थित आहेत; परंतु पावसाळ्यात जीवघेणे होवू शकतात, नव्हे होतात. याचे मुख्य कारण म्हणजे खंडाळा येथील वरवडे फाटा ते एसटी पिक अप शेड या भागात तसेच रीळ केसपुरी भागातील छोटा पूल तसेच जोड रस्ता या ठिकाणी, अतिवृष्टीच्या काळात नित्यनियमाने भयावह पाणी साठते. एखादा तातडीचा रुग्ण किंवा नवागत प्रवासी पावसाच्या पाण्यात वाहून जाऊ शकतो.
या पावसाळ्यातही १२ जून रोजी अशी परिस्थिती उद्भवली होती. मी स्वतः त्या दिवशी दोन्ही ठिकाणी अडकलो होतो. वरवडे गावातून केसपूरीकडे येताना सुद्धा एक छोटी मोरी धोकादायकरित्या वाहत असते. वरवडे कुंभारवाडा येथील नितीन वासुदेव जोशी यांच्या घराजवळील पुलावरूनसुद्धा पाणी वाहत असते. काही ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा असणारे वृक्षसुद्धा धोका निर्माण करीत आहेत.या सर्व ठिकाणांचे सर्व्हेक्षण होऊन तात्काळ उपाययोजना केली पाहिजे.””वर उल्लेख केलेल्या लोकवस्तीचा विचार करून हा मार्ग लवकरात लवकर निर्धोक होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात यावी. स्थानिक जनतेच्या सहकार्याने, त्यांच्या सल्लामसलतीने हे काम करण्याच्च्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात. एकाही निष्पाप नागरिकाचा बहुमोलाचा प्राण वृथा जाऊ नये यास्तव युद्धपातळीवर हे काम करण्यात यावे, अशी मागणी अनिरुद्ध साळवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.