
100 युनिटच्या आतील वीज ग्राहकांना 26 टक्के शुल्क कपातीचा निर्णय
महावितरणने वीज दर बिलात वाढ केल्याची ओरड होत असतानाच राज्य सरकारने पावसाळी अधिवेशात मोठी घोषणा केली. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. वीज दर कपातीचा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे.महायुती सरकारने जनतेला मोठे गिफ्ट दिले. 100 युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होईल. 100 युनिटच्या आतील वीज ग्राहकांना 26 टक्के शुल्क कपातीचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात बुधवारी याविषयीची मोठा घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना याविषयीची माहिती दिली. ग्राहकांची सुनावणी न घेता काही निर्णय का घेण्यात येत आहे, असा आमदार पाटील यांचा सूर होता. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. एमआरसीने चुकीचे आदेश दिल्याचे आणि त्यात दुरुस्तीची संधी असल्याचे म्हणणे सतेज पाटील यांनी सभागृहात मांडले.
राज्यातील 70 टक्के ग्राहकांचा वीज वापर हा 100 युनिटपेक्षा कमी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे या 70 टक्के ग्राहकांना 26 टक्क्यांचे टेरिफ रिडक्शन, शुल्क कपात लागू असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. त्याच्या पुढील कुठल्याच श्रेणीत वाढ नाही. वीज ग्राहकांच्या सर्व श्रेणीत शुल्क कपात केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वीज बिल आकारण्यातील त्रुटीवर मुख्यमंत्र्यांनी बोट ठेवले. 90 हजार कोटींची आकडेमोड दुहेरी होत असल्याचे सरकारने लक्षात आणून दिले. एकीकडे घरगुती ग्राहकांना वीज सवलतीचा फायदा नाही तर दुसरीकडे जालन्यातील एका स्टील कंपनीला 200 कोटींचा फायदा सवलतीतून मिळत असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर MERC ने प्रकरण दाखल करून घेतले. नंतर त्रुटीत दुरुस्ती करण्यात आली. राज्यातील सर्व फीडरवर स्मार्ट मीटर बसले आहेत. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस कृषी वीज पुरवठ्यात नेमका कुठे किती तोटा होत आहे, याची आकडेवारी समोर येईल अशी माहिती त्यांनी दिली.