राजापूर येथे नवजात बालकाचा मृत्यू; दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल


राजापूर येथे वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आणि प्रसूती झालेल्या मातेचे गर्भाशय काढावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मेस्त्री आणि डॉ. डवरी (पूर्ण नाव माहीत नाही) अशी त्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजेश दीपक रायबागकर (३६, रा. पाचल बाजारपेठ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी तृप्ती रायबागकर यांना ३० मार्च २०२५ रोजी पहाटे ३:३० वाजता प्रसूतीसाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. डवरी यांनी प्रकृती गंभीर असतानाही तृप्ती यांना वेळेवर दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले नाही आणि सायंकाळपर्यंत रायपाटण ग्रामीण रुग्णालयातच थांबवून ठेवले, असा आरोप रायबागकर यांनी केला आहे.
याच दरम्यान, रायपाटण ग्रामीण रुग्णालयातील प्रमुख स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मेस्त्री हे २४ तास रुग्णालयात हजर नव्हते. त्यांनी वेळेवर उपचार न करता, फिर्यादींची दिशाभूल करून शासकीय रुग्णवाहिकेचा गैरवापर करत तृप्ती यांना त्यांच्या खासगी वृंदावन रुग्णालयात दाखल केले. तसेच, नवजात बालकाला रत्नागिरी येथे नेत असताना ऑक्सिजन न लावताच नेले, असेही फिर्यादीत नमूद आहे.

यानंतर, रत्नागिरी येथील डॉ. संघवीकर यांनी नवजात बालकाला कोल्हापूर येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, बालकाला प्रथम साईस्पर्श हॉस्पिटल आणि त्यानंतर सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये त्या नवजात बालकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

डॉ. मेस्त्री आणि डॉ. डवरी यांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे पत्नीचे गर्भाशय काढावे लागले आणि नवजात बालकाचा मृत्यू झाला, असे फिर्यादी तेजेश रायबागकर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी १२ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:२० वाजता पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०४(अ), ३३८, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button