
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरात पाईपलाईनची गळती न काढताच महामार्गाचे काम.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना शहरातील प्रांत कार्यालयासमोर फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती न करताच त्यावर मातीचा भराव टाकला जात आहे. यामुळे दिवसाला शेकडो लीटर पाणी वाया जात असून नागरिकांना मात्र कमी दाबाने पाणी मिळत आहे. यासंदर्भात नगर परिषद ठेकेदार कंपनीकडे सातत्याने पत्रव्यवहार करीत आहे.अर्ध्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खेर्डी-माळेवाडी येथे असलेल्या जॅकवेलमधून खेर्डी दत्त मंदिर ते बायपास साठवण टाकी अशी मुख्य पाईपलाईन आणण्यात आली आहे. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदाई करताना ही मुख्य पाईपलाईन सातत्याने फुटत आहे. यामुळे बावशेवाडी, खंड-कांगणेवाडीसह काही भागांचा पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. तरीही महामार्गाचे काम करणारी ठेकेदार कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे.www.konkantoday.com