
पावसाने सरासरी ओलांडली आपत्ती स्थितीवर पूर्ण लक्ष-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
रत्नागिरी : गेल्या आठ दिवसांपासून जिल्हयात असणारा पावसाचा ओघ कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली. सोबतच आता रोगराई पसरु नये याची खबरदारी घेतली जात आहे. शक्य तितक्या पात्र व्यक्तींना तातडीची मदत प्रशासनाने दिली आहे अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
यावर्षी प्रत्यक्षात 3251 मिलीमीटर (107) टक्के पावसाची नोंद झाली. जुन महिन्यात सरासरी 728 मिमी (89) टक्के तर जुलै महिन्या 2477 मिमी (117)टक्के पावसाची नोंद झाली आहे.
चिपळूण तालुक्यात तिवरे धरण फुटून भेंदवाडी हे गाव वाहून गेले होते. यासह आतापर्यंत 28 व्यक्तींचा पूरात मृत्यु झाला आहे. इतर अपघात 1 जण मरण पावला
या पावसात 159 जनावरे वाहून गेली तर 763 घरांचे नुकसान झाले आहे. सर्व मालमत्तेचे आतापर्यंत झालेले नुकसान 10 कोटी 28 लाख रुपये मुल्याचे आहे.
पूर परिस्थितीमुळे 13 गावांमधील 173 कुटुंबातील 617 जणांना स्थलांतरीत करण्यात आले. यासाठी एनडीआरएफ चे 24 जवान तसेच कोस्टगार्ड 80 जवान आणि 4 बोटी व महसूल विभागातील सर्वच स्थरातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
चिपळूण आणि खेड जलमय झाल्याने त्या भागात वेगळया 4 बोटींची मदत होत आहे. याखेरीज तपास व इतर मदत कार्यासाठी टोळकेश्वर येथल एक रडार केंद्र, 7 पाणबुडे आणि 5 स्वंयसेवी संस्थांची मदत प्रशासनाला होत आहे.
चिपळूण, खेड तसेच रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आरोग्य तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत.
यंदाच्या पावसाळयात चिपळूणमधील वाशिष्टी नदीला पूर आल्याने 10 वेळा तर खेड जवळ जगबुडी नदीला पूर आल्याने 13 वेळा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागली.
राजापूर तालुक्यात अर्जुना नदीच्या पूराची पातळी वाढल्याने कोदवली पुलावरील वाहतूक 11 वेळा बंद झाली. जगबुडीची नदीची पातळी 9.5 मीटरपर्यंत वाढल्याची नोंद या काळात झाली.
सतत मुसळधार पावसामुळे जमिनीला भेगा पडण्याचा घटना या काळात मोठया प्रमाणात घडल्या. गुहागर आणि दापोली तालुके वगळता इतर तालुक्यात 26 ठिकाणी जमिनीला भेगा गेल्याची नोंद प्राप्त झाली आहे.
धरणे
जिल्हयात 3 मोठी धरणे असून ती पूर्णपणे सुरक्षित आहेत असुरक्षित वाटणाऱ्या 7 प्रकल्पातील पाणीसाठा कमी करुन त्यांनाही या पातळीवर आणण्याचे काम प्रशासनाने केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील नियंत्रण केंद्रातून अहोरात्र (24X7) परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या सर्व काळात महसूल, पोलीस तसेच इतर यंत्रणांनी उत्तम काम केले त्यांचे मी कौतूक करतो असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.
www.konkantoday.com