
परसबाग निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील शाळांसाठी आता परसबाग स्पर्धा.
राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रसन्न मनासाठी परसबाग निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत या परसबाग निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील ६८ हजार ४०७ शाळांतून परसबागेची निर्मिती झाली आहे.केंद्राच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शाळांमध्ये परसबाग निर्माण कराव्यात. त्या परसबागांतून उत्पादित भाजीपाला आणि इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश केले आहेत. परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे आदींचा समावेश शालेय पोषण आहारात करून विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळेल. तसेच ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होवून विद्यार्थ्यांना पौष्टीक आहार उपलब्ध होईल, असे चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. राज्यात परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी गतवर्षी शासनाने उत्कृष्ट परसबाग स्पर्धा घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे यावर्षीही या स्पर्धा आयोजिल्या आहेत.परसबाग निर्मितीसाठी आणि पीक पद्धतीच्या माहितीसाठी नजिकचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी शाळा, कृषी विभागातील सहाय्यक पर्यवेक्षक, कृषी क्षेत्रातील कार्यरत विविध संस्था, सेंद्रीय शेती करणारे शेतकरी, कृषी तज्ञांच सहकार्य घेता येणार आहे. उत्कृष्ट परसबाग स्पर्धेसाठी तालुका, जिल्हा असे स्तर ठेवले आहेत.www.konkantoday.com