राजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री पाच घरे फोडून ४ लाख ४३ हजार रूपयांचा ऐवज लांबविला !

राजापूर :* राजापुर तालुक्यातील कोंड्ये येथे शिक्षक कॉलनीसह अन्य दोन वाड्यांतील एकाच रात्री तब्बल पाच घरफोड्या करीत चोरट्यांनी चांदीच्या मुर्त्या आणि रोख रक्कमेसह तब्बल ४ लाख ४३ हजार रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. एकाच दिवशी पाच घरे फोडण्याच्या धाडसी चोरीमुळे तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये राजापुर शहरातील बाजारपेठेतील छोट्या टपर्‍यांवर भुरट्या चोरट्यांनी हात मारल्याच्या घटनेनंतर ग्रामीण भागातील या धाडसी घरफोडी अन् चोरीचा उलगडा करून चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

या घरफोडी प्रकरणी अशोक महाडेश्‍वर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. या चोरीप्रकरणी पोलीस निरिक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस तपास करीत आहेत.कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह बौध्दवाडी आणि मधलीवाडी येथील रहिवाशी अशोक महाडेश्वर, मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड, अविनाश रामचंद्र तावडे यांच्या बंद स्थितीतील पाच घरांमध्ये सोमवारी रात्री चोरट्यांनी चोरी केली. यामध्ये फिर्यादी श्री. महाडेश्वर हे कणकवली तालुक्यातील आपल्या तिवरे गावावरून येऊन जाऊन असत.

श्री. महाडेश्वर यांच्या घरातून रोख सहा हजार रूपयांसह यासह अन्य सोन्याचे दागिन्यांची चोरी केली आहे.सोन्याच्या दागिन्यांमध्ये १५ ग्रॅम सोन्याची आईची गळयातील मन्याची माळ, २४ ग्रॅमचा गळ्यातील सोन्याचा हार, १२ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र २ सोन्याचे कॉईन प्रत्येकी वजन ५ ग्रॅम, २ ग्रॅम सोन्याचा एक कॉइन, ३ सोन्याचे कॉईन प्रत्येक ३ ग्रॅम वजनाचे, ५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोल आकाराची रिंग, ५.३० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे छोटे रिंग, सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सोन्याची कुढी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, चंद्राची पैजण सुमारे पाच ग्राम वजनाची असा सुमारे ३ लाख ९३ हजार रूपयांच्या ऐवजाचा समावेश आहे. तर, मुरलीधर मोरे यांच्या घरातील सुमारे चाळीस हजार रूपये किंमतीच्या चार चांदीच्या मुर्त्या आणि रोख १० हजार रूपये असे मिळून ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे.योगेश सुरेश मारे, अविनाश तावडे व शशिकांत लाड यांची बंद घरे फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, या तीन घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागलेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घरफोडींबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरिक्षक श्री. यादव यांनी सहकार्‍यांसमवेत घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले.या श्वानाने चोरी झालेल्या घरांपासून मुंबई गोवा महामार्गावरील कोंडये येथे पुलापर्यंत माग काढला आहे. त्यानंतर, या ठिकाणी श्वान घुटमळला. त्यामुळे चोरटे महामार्गावरून आले असावेत वा त्यांनी यासाठी दुचाकीचा वापर केला असावा असा पोलीसांकडून प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करून ठसेही घेण्यात आले आहेत. घरफोडी झालेली पाचही घरे बंद असल्याबाबत या घरांसह परिसराची चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी रेकी केली असावी. त्याचवेळी कटावणीने सर्व घरांची तोडलेली लॉक आणि चोरी करताना वापरलेल्या क्लृपत्या पाहता चोरटे सराईत असण्याचा प्राथमिक अंदाजही पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button