
रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर अश्फाक काद्री यांची नियुक्ती
: रत्नागिरी. रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर काँग्रेसचे कट्टर आणि निष्ठावान कार्यकर्ते अश्फाक काद्री यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी काद्री यांची नियुक्ती केली. या निवडीनंतर शहर काँग्रेसमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अश्फाक काद्री यांची शहराध्यक्ष पदावर नियुक्ती होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अश्फाक काद्री यांची रत्नागिरी शहर अध्यक्ष पदावर निवड झाल्याची माहिती मिळताच माजी आमदार हुस्नबानु खलीफे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश किर यांच्यासह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि खऱ्या अर्थाने तळागाळात काम करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला हे पद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
अशफाक काद्री हे सुरवाती पासूनच काँग्रेसचे एक कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. एका सच्चा आणि निष्ठावान कार्यकर्त्यांकडे फार मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याने सर्वसामान्य कार्यकार्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात त्यांच्या समोर रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीचे फार मोठे आव्हान समोर असणार आहे आणि या वेळी त्यांची कसोटी लागणार आहे.चौकटप्रदेश काँग्रेसकडून जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्षांची घोषणाप्रदेश काँग्रेसकडून रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यातील ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार ४ जून रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. नव्याने निवड करण्यात आलेल्या मध्ये लांजा ब्लॉक अध्यक्ष पदावर राजेश राणे, संगमेश्वर ब्लॉक अध्यक्षपदावर काशीराम वाजे, गुहागर ब्लॉक अध्यक्ष पदावर गजानन उर्फ दिलीप वसंत जाधव आणि दापोली ब्लॉक अध्यक्ष पदावर मंगेश राजाराम मोरे यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.