गुहागर तालुका अध्यक्ष निवडीवरून नाराजी, अनेक वर्षांच्या कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष;मिलिंद चाचे यांची काँग्रेसला रामराम ठोकण्याची तयारी


काँग्रेसचे धडाडीचे माजी तालुका अध्यक्ष मिलिंद चाचे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी दर्शवली आहे. गुहागर तालुका काँग्रेस अध्यक्ष निवडताना पक्षाने विश्वासात न घेतल्याने ते कमालीचे नाराज असून, मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात पक्षातून सहकार्य मिळाले नाही, तसेच केलेल्या कार्याचे कौतुकही करण्यात आले नाही, याची त्यांना विशेष खंत आहे.

मिलिंद चाचे लवकरच अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती असून, रायगड-रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांच्याशी ते संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मिलिंद चाचे यांनी कोळी समाजाच्या जमिनीचा प्रश्न, अंगणवाडीच्या समस्या, गणपती व होळी सणासाठी चाकरमान्यांना एस.टी. बस उपलब्ध करून देणे, कुडलीच्या टंचाईग्रस्त वाडीला बोरवेल उपलब्ध करून देणे, तसेच अलीकडेच तवसाळ-कुडली-अक्कलकोट ही स्वामी भक्तांसाठी बस सेवा सुरू करणे, अशी अनेक लोकहिताची कामे केली आहेत.

त्यांचा जनसंपर्क व सामाजिक कार्यक्षमता पाहता त्यांचा अजितदादा पवार गटातल्या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होणार हे निश्चित आहे. विशेषतः पडवे जिल्हा परिषद गटात काँग्रेसला दिलेल्या बळामुळे आता अजित पवार गटाचे वजन वाढणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button