
रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे संरक्षण विभागाचा धीरूभाई अंबानी डिफेन्स लिमिटेड हा मोठा प्रकल्प सुरू करण्याच्या हालचालींना वेग
उद्योगपती अनिल अंबानी यांचा कोकणातील वाटद (ता. रत्नागिरी) संरक्षण विभागाचा धीरूभाई अंबानी डिफेन्स लिमिटेड हा मोठा प्रकल्प सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.या डिफेन्स लिमिटेड प्रकल्पातून स्फोटके, दारूगोळा, शस्त्रांचा कारखाना उभारणार आहे. संरक्षण क्षेत्रातील हा सर्वांत मोठा नवीन प्रकल्प मानला जात आहे. जिल्हा प्रशासनाने याला दुजोरा दिला.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक वर्ष २०२७च्या अखेरीस १५५ मिमी दारूगोळा आणि अॅग्रीगेट्सच्या निर्यातीतून ३ हजार कोटी रुपये कमवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनी चालू आर्थिक वर्षातच १५०० कोटी रुपयांच्या मोठ्या कॅलिबर दारूगोळा निर्यात करण्याचा अंदाज व्यक्त करत आहे. अहवालानुसार, कंपनीने आतापर्यंत १०० कोटी रुपयांचा तोफखाना दारूगोळा आणि संबंधित उपकरणे निर्यात केली आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे भारतातील टॉप ३३ संरक्षण निर्यात करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीचे मुख्य लक्ष युरोपियन युनियन बाजारपेठेवर आहे, जिथे तोफखाना, दारूगोळा साठ्याची मोठी मागणी आहे.
अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने महाराष्ट्रात सुरू करण्यात येणाऱ्या डिफेन्स प्रोजेक्टची घोषणा केली. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर सबसिडरी कंपनी आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनी कोकणात धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी उभारणार आहे. या प्रकल्पासाठी रत्नागिरीतील वाटद औद्योगिक परिसरात १००० एकर जमीन देण्यात आली आहे. येथेच धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटीमध्येच रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनी उभारली जाणार आहे.