कोकण रेल्वे प्रशासनाने मुसळधार पावसात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली


पावसाळा सुरू होण्या आधीच कोकण रेल्वे प्रशासनाने मुसळधार पावसात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मार्गावरील संवेदनशील मार्गावर २४ तास गस्त घालण्यासाठी ६३६ प्रशिक्षित कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच यंदाच्या भौगोलिक कामांकरिता ३४ कोटी रुपये खर्च केले आहेत.

नवी मुंबईतील कोकण रेल्वेच्या कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी यंदाच्या पावसाळ्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.

दरवर्षी कोकण रेल्वे मार्गावर पावसामुळे दरड कोसळणे, रुळांवर पाणी साचणे, पूलांवर ताण येणे, तसेच वाऱ्याचा वेग अचानक वाढणे या समस्या उभ्या राहतात. यंदाही या सर्व बाबींचा विचार करून रेल्वे प्रशासनाने संपूर्ण पावसाळा काळ लक्षात घेता सुरक्षेची सर्वंकष योजना आखली आहे.

यंदाच्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या काळात हवामान खात्याशी रोजचा समन्वय साधला जाणार असून एका दिवसात १०० मिमीहून अधिक पाऊस झाल्यास रेल्वेसेवा तात्पुरती थांबविण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास कार्यरत राहणारे नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहेत. तसेच चिपळूण, रत्नागिरी,वेरणा,मडगाव,कारवार आणि उडपी येथे वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवली आहेत.
मार्गावरील अतिसंवेदनशील भांगावर ३६५ प्रशिक्षित कर्मचारी दिवस-रात्र कामावर तैनात केले आहेत.याशिवाय रत्नागिरी,चिपळूण,कणकवली आणि वेरणा येथे आपत्कालीन स्थितीत तत्काळ हस्तक्षेत करता यावा यासाठी खोदकामासाठी लागणारी यंत्रसामग्री सज्ज ठेवली आहे. रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये बिघाड झाल्यास माणगाव,चिपळूण,रत्नागिरी,कणकवली,कारवार आणि उडपी येथे टॉवर वॅगन्स सज्ज ठेवले आहेत.
पनव्हल व्हायाडक्ट, मांडवी, झुआरी आणि शरावती हे कोकण रेल्वेमार्गावरील चार महत्त्वाचे पूल आहे. पावसाळ्यात या पूलावर वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ते अत्यंत संवेदनशील मानले जातात. याठिकाणी यंदा वाऱ्याचा वेग अचूकपणे मोजण्यासाठी अॅनिमोमीटर्स बसवले आहेत. वाऱ्याचा वेग धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यास तात्काळ वाहतूक थांबविण्याचा निर्णय़ रेल्वे प्रशासन घेऊ शकते. यामुळे अपघात रोखण्यास मदत होणार आहे.
वेगमर्यादा

रोहा ते वीर—१२० किमी प्रतितास

वीर ते कणकवली—— १२०ते ७५ किमी प्रतितास

कणकवली ते उडुपी—– १२० ते ९०किमी प्रतितास

उडुपी ते ठोकुर—–१२० किमी प्रतितास

आपत्कालीन व्यवस्था – माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडुपी येथे आपत्कालीन प्रतिसादासाठी टॉवर वॅगन्स उभ्या आहेत.

अपघात निवारण पथके – रत्नागिरी,वेर्णा येथे अपघात निवारण ट्रेन सज्ज

२४ तास नियंत्रण कक्ष – बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव

वैद्यकीय पथके – चिपळूण, रत्नागिरी, वेरणा, मडगाव, कारवार आणि उडपी

गस्त – ६३६प्रशिक्षित कर्मचारी दिवस-रात्र गस्तीसाठी तैनात

रेल्वे मेंटेनन्स व्हेईकल्स – ९ ठिकाणी तैनात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button