कोकणातील नेते काळी जादू करतात, 2009 च्या निवडणुकीत रामदास कदम यांनी मांत्रिक आणला होता -आमदार भास्कर जाधव


एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात काळ्या जादूबाबत चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी रोहयो मंत्री भरत गोगावले यांचा पूजा करतानाचा एक फोटो व्हायरला झाला आणि काळ्या जादूचे आरोपाला पुन्हा धार आली.त्याचसंदर्भाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील नेते आमदार भास्कर जाधव यांनीच कोकणातील नेते काळी जादू करतात, हे मनमोकळेपणाने मान्य केले आहे. ते करताना त्यांनी माझ्यावरच दोन वेळा काळ्या जादूचे प्रयोग झाले होते, अशी खळबळजनक कबुली दिली. ही कबुली देताना त्यांनी एक नेत्याचे नावही घेतले आहे.

मी आतापर्यंत नऊ निवडणुका लढलो, त्यातील आठ वेळा मी जनतेच्या कृपेने निवडून आलो. पण मी कधीही मुहूर्त पाहून अर्ज भरलेला नाही. मी चिपळूणमध्ये राहत असलो तरी निवडणुकीच्या वेळी मी माझ्या मूळ गावी जाऊन ग्रामदेवतेचे दर्शन घेतो, घरातील कुलस्वामीला नमसकार करतो आणि आई-वडिलांचा आशीर्वाद घेतले की माझा मुहूर्त सुरू होतो, अशी माझी निवडणुकीचा अर्ज भरतानाच्या वेळीची पद्धत असते. जोपर्यंत मी आई वडिलांच्या पायाला हात लावत नाही, तोपर्यंत मला मुहूत नसतो, असेही आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.आमदार जाधव म्हणाले, आमच्या कोकणातील बहुतांशी मोठमोठे नेते हे असल्या गोष्टी म्हणजे काळी जादू करतातच. अंगारे, धुपारे, काळी जादू, बंगाली जादू, विभूती फुंकणं असे प्रकार करत असतात. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना सिंधुदुर्गमध्ये एका बैठकीला गेलो होतो. त्या वेळी माझ्या अंगावर थोड्या थोड्या वेळाने तांदूळ पडत होते. पहिल्यांदा पडल्यावर वाटलं कुठून तरी पडला असेल, म्हणून दुर्लक्ष केले.

दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा पुन्हा तांदूळ पडले. बघतो तर सारखे थोड्या थोड्या वेळाने माझ्या अंंगावर तांदूळ पडत आहेत. मी आजूबाजूला पाहिलं आणि विचारलं हे तांदूळ कुठून पडत आहेत, ही काय भानगड आहे. त्या वेळी एकजण म्हणाला, तो बघा कोपऱ्यात बसला आहे. तो तुमच्या अंगावर तांदूळ फेकतोय. मी विचारलं हे माझ्यावर कसले तांदूळ फेकतोय. तो कार्यकर्ता म्हणाला, तुमच्याकडे जो नेता बसला आहे ना, त्याला भीती वाटतेय की, तुम्ही सिंधुदुर्गचे नेते व्हाल आणि त्याचे नेतृत्व जाईल. म्हणून कोपऱ्यात बसून माझ्यावर एकजण तांदूळ फेकत होता.माझा असल्या काळी जादू, अंगारे, धुपारे याच्यावर अजिबात विश्वास नाही. माझा माझ्या कर्मावर, नशिबावर आणि माझ्या नियतीवर विश्वास आहे. पण, कोकणातील मोठमोठे नेते काळ्या जादूचे प्रयोग करतात, हे वास्तव आहे, असेही भास्कर जाधव यांनी ठामपणे सांगितले.

ते म्हणाले, माझ्या विरोधात 2009 मध्ये शिवसेनेचे रामदास कदम उभे राहिले होते. ते बामावले… ते परवा रडत होते, त्यामुळे मी त्यांना झेंडूबामवाले नाव दिले होते. ते गुहागरमधील पाठपन्हाळ्यात जिथे उतरले होते, राहिले होते. ते माझ्या नातेवाईकांचे घर होते. ते नातेवाईक मला म्हणाले, ‘ते रामदासभाई, मोठमोठे मांत्रिक, बाबा, जादूवाले, माती, लिंबं, एवढी काळी मिरची घेऊन आले आहेत. तुम्ही एकदा या.’

रामदास कदम हे सकाळपासून बारा ते एकपर्यंत त्या मांत्रिकांच्या पुढ्यातच बसलेले असायचे. दुपारी फिरून येतात आणि पुन्हा संध्याकाळी मांत्रिकाच्या पुढे बसलेले असतात, असे माझ्या नातेवाईकांनी सांगितले. मी एकदा गुपचूप त्या ठिकाणी गेलो, जाऊन पाहिले तर होमहवन, ते बाबा आणि मांत्रिक. ते सर्व पाहून वाटलं, हे बाबा जर निवडून देणार असतील तरी सर्वजण या बाबांना आणि मांत्रिकांनाच पुढे घेऊन बसले असते. पण एवढं करूनही रामदास कदमांचा पराभव करून मीच निवडून आलो, असेही जाधवांनी नमूद केले.मतदानाच्या दिवशी माझ्या घराच्या बाहेर पिशवीभर लिंबं पडली होती. त्याला लिंब, टाचण्या लावलेल्या होत्या. आमच्या वॉचमन पाहिलं आणि आम्हाला येऊन सांगितलं,’ एवढी लिंब घराबाहेर पडली आहेत. मी म्हटलं आण त्याचा सरबत करून पिऊया. त्या वेळी आई माझ्यावर रागावली होती. पण सिंधुदुर्ग आणि रायगडचे नेतेही तसेच आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button